कासव तस्करी करणाऱ्या तरुणांना बारामती ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात
बारामती/ प्रतिनिधी: कासव तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बारामती ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील कासव व रिक्षा हस्तगत करून पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी (दि.२२) रोजी वंजारवाडी (ता. बारामती) परिसरात दोन अज्ञात तरुण मुले पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षांमधून संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती ग्राम संरक्षण यंत्रणाकडून बारामती तालुका पोलिसांना मिळाली.
सदरची माहिती मिळताच क्षणी पोलिसांनी वंजारवाडी येथे जाऊन संशयित इसम राजू सजन गायकवाड (वय २२),विजय अरुण गायकवाड (वय २१) दोघे रा.(आमराई,बारामती) यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील ऑटो रिक्षा क्रमांक (एम एचं बी २०५४ ) मध्ये एक कासव मिळाले. सदर कासव बाबत चौकशी केली असता त्यांनी कासव विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. कासव जवळ बाळगणे, त्याची विक्री करणे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा १९७२ नुसार गुन्हा असून कासवा पासून पैशाचा पाऊस पडतो, या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. सदर दोन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षा पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस हवलदार दत्तात्रय कुंभार, पोलीस नाईक रमेश नागटिळक, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, प्रशांत राऊत, मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, निखिल जाधव, अबरार शेख यांनी केली आहे.