
सांगवी: दागिने, पैशांसाठी सुनेचा छळ! 'त्या' विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर बारामती तालुका पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल
Saturday, May 29, 2021
Edit
सांगवी (ता. बारामती) येथील गितांजली अभिषेक तावरे (वय २१) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर ५ जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहेरहून ४० ते ५० तोळे सोने आणावे, या मागणीसाठी गितांजली हिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नणंद सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली), वर्षा वाबळे (रा. पुणे), सासू शारदा वसंत तावरे, पती अभिषेक वसंत तावरे व सासरे वसंत केशवराव तावरे (रा. सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गीतांजली व अभिषेक यांचा विवाह २४ मे, २०२० रोजी झाला होता. त्यावेळी लॉकडाऊन असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सांगवीत हा विवाह पार पडला. विवाहापूर्वी झालेल्या बोलणीनुसार ७ तोळे सोने, १ लाख रुपये हुंडा व दीड लाखांची गृहपयोगी साहित्य देण्यात आले.
विवाह झाल्याच्या दिवशीच गितांजली हिला नणंद सचिता हिने तुम्ही माझ्या भावाचे लग्न थाटामाटात केले नाही, गावातून वरात काढला नाही, अवघे सात तोळे सोने देवून आमची इज्जत घालवली, असे बोलून अपमानित केले.गितांजली हिने दुसर्या दिवशी वडिलांना फोन करत ही बाब सांगितली. मी सोळाव्याच्या पूजेला आल्यावर बोलतो, तू मनावर घेऊ नको, असे सांगत वडिलांनी तिची समजूत काढली होती.
त्यानंतर विवाह झालेल्या दिवशीच सासू शारदा हिने चांगल्या सुटकेस, बॅगा मिळाल्या नाहीत, बोचक्यासारखे पिशवीत, पोत्यात भरून कपडे दिलेत, असे म्हणत तिचा अपमान केला होता. पती अभिषेक याने तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का साड्या घ्यायच्या, या कसल्या हलक्या साड्या लग्नात दिल्या आहेत ,असे म्हणत साड्या तिच्यावर फेकून दिल्या. तुझ्या बापाला सांग आमची भावकीशी बरोबरी करण्यासाठी ५० तोळे सोने द्यायला, असे म्हणत तिला अपमानित केले होते, असेही फिर्यादी म्हटले आहे.
सोळावा पूजेदिवशी यादव यांनी सांगवीत येत समजूत घातली. यावेळी गितांजली हिने घडलेला प्रकार वडीलांना सांगितला. पूजेनंतर त्याच दिवशी ती माहेरी परतली. माहेरी तिने सासू, सासरे, पती व दोन नणंदा यांनी लग्नापासून ते सोळावा पूजेपर्यंत साड्यांसाठी व सोन्याच्या दागिन्यांसाठी त्रास दिल्याचे सांगितले. तिची समजूत घालत माहेरकडील मंडळींनी चार दिवसानंतर तिला सासरी सोडण्यास गेले असताना सासरकडील मंडळींनी त्यांना, चांगल्या साड्या आणल्या आहेत का, सोन्याचे दागिने आणले आहेत का? अशी विचारणा करत दोन तास घराबाहेर ताटकळत ठेवले होते. त्यानंतर घरातून शिव्या देत भिकारीसुद्धा २० तोळे सोने घालतील, तुमच्या मुलीला त्याशिवाय नांदू देणार नाही, असे म्हणत कसेबसे तिला घरात घेतले होते. त्यामुळे तिच्या माहेरकडील मंडळींनी पैशाची जुळवाजुळव करत आणखी पाच तोळे सोन्याचे दागिने दिले. त्यानंतरही सासरच्या लोकांची हाव कमी झाली नाही. पैशासाठी गितांजली हिचा छळ सुरुच राहिला.
गीतांजलीला मोबाईलवर बोलू न देणे, सणाला माहेरी न पाठवणे असे प्रकार सुरु झाले. २४ मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी माहेरकडील मंडळींनी गितांजली हिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केले असताना तिने कसल्या शुभेच्छा देता, दोन नणंदा आल्या आहेत, आज माझा मरण दिवस आहे, नणंदा व पतीने मला मारहाण केल्याचे फोनवर रडत सांगितले. त्यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी सासरे वसंत तावरे यांनी गितांजलीने शेतात फवारणीचे औषध प्राशन केल्याचा निरोप तिच्या माहेरी दिला.
माहेरकडील मंडळींनी तातडीने बारामतीला धाव घेतली. येथून तिला पुण्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा २७ मे रोजी मृत्यू झाला. दि. २८ रोजी माहेरकडील संतप्त मंडळींनी सासरच्या दारातच तिचे अंत्यसंस्कार केले. अवघ्या वर्षभरात मृत्यूला कवटाळणाऱ्या गितांजलीच्या आत्महत्येमुळे सांगवीत गेली दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी परिस्थिती हाताळली, त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.