
दुबार पेरणीचे संकट टाळायचे असल्यास शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पिकांच्या पेरणी कराव्यात; कृषी खात्याचे अवाहन
Wednesday, May 26, 2021
Edit
मोरगाव : बारामती तालुक्यात चार कृषी मंडल कार्यालय असून काही दिवसावर येऊन ठेपलेल्या खरिप हंगामासाठी लागणारी खते, औषधे, बी बियाणे यांची पुर्ण तयारी कृषी खात्यामार्फत केलेली आहे. यंदा सरासरी पंचवीस हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली.
बारामती तालुक्यामध्ये सुपा, उंडवडी क. प., वडगाव निंबाळकर व बारामती येथे चार कृषी मंडळ कार्यालय आहेत. या खरीप हंगामात यंदा पंचवीस हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी खात्यामार्फत आहे. खरिपामध्ये तालुक्यात प्रामुख्याने दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बाजरीचे पेरणी केली जाते. त्याचबरोबर कांदा, भुईमूग, सोयाबीन, मूग, मटकी, सूर्यफूल, आडसाली ऊस, तूर व इतर भाजीपाला पिके घेतली जातात. खरिपाच्या पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी खात्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे की, साधारणतः ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच या पिकांच्या पेरणी कराव्यात. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट टाळता येईल असे आवाहन सुपा मंडल कृषी अधिकारी सुभाष बोराडे यांनी केले आहे. यंदा पाण्याच्या उपलब्धतेनुसार आडसाली उसाची लागण वाढण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामामध्ये अथवा मागणीनुसार जर एखाद्या खत विक्रेत्या व्यावसायिकाने शासनाने खतांच्या निर्धारीत केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतल्यास कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन पडवळ यांनी केले आहे. या खरीप हंगामामध्ये बीजप्रक्रिया, पाचट कुजवणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे, दहा टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करणे व हिरवळीचे खत वापरणे हे विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधीकाऱ्यांनी दिली ......................................................
ज्या शेतकऱ्यांना जमीन सिंचनासाठी कमी पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी महिको ८२०३ तर अधिक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी श्रद्धा व सबुरी ही सुधारित संकरीत बाजरी बियाणे वापरावे. तसेच कृषी विषयक सल्ल्यासाठी कृषी साहाय्यक, पर्यवेक्षक, मंडल अधीकारी अथवा तालुका कृषी अधीकाऱ्यांशी संपर्क साधावा
दत्तात्रय पडवळ : तालुका कृषी अधीकारी बारामती
......................................................
सुपा मंडल अंतर्गत येणाऱ्या गावांना मोरगाव, सुपा, तरडोली, लोणी भापकर, आंबी बु, आंबी खुर्द आदी गावातील शेतकऱ्यांना बी बियाणे, औषधे, खते यांचा कुठलाही तुटवडा जाणवणार नाही
सुभाष बोराटे : मंडल कृषी अधीकारी सुपे