-->
बारामतीतील जनता कर्फ्यू 20 सप्टेंबर पर्यंत कायम; पुढील तीन दिवसांत प्रत्येक व्यक्तीची होणार तपासणी

बारामतीतील जनता कर्फ्यू 20 सप्टेंबर पर्यंत कायम; पुढील तीन दिवसांत प्रत्येक व्यक्तीची होणार तपासणी

बारामतीत प्रशासनाने १४ दिवसांच्या जनता कर्फ्यूची अधिसूचना प्रसिध्द केली. त्यानुसार आता पुढील सात दिवसही जनता कर्फ्यू लागू असणार आहे. त्यामुळे २१ सप्टेंबरनंतरच बारामतीतील व्यवहार सुरू होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सायंकाळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


बारामतीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून वाढत राहीला आहे. सामूहिक संसर्गाचा वेग जोरात सुरू झाला असून कोरोनाचा गुणाकार सध्या सुरू आहे. मार्च ते ऑगस्ट अखेरपर्यंत बारामती व तालुक्यात सर्व मिळून १ हजार रुग्ण आढळले, तर २ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत एक हजार रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या १०० च्या वर जाऊ लागताच बारामतीत जनता कर्फ्यू लागू करण्याच्या मागणीस जोर आला. त्यानंतर दररोज १०० हून अधिक रुग्ण दिसू लागले.


अजूनही दररोज ८० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आढळत आहेत. ही संख्याही काही कमी नाही. जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर मात्र सुरवातीच्या वेगात फरक पडला आहे. शहरातील रुग्णांच्या संख्येतही घट दिसू लागली आहे. त्यामुळे हा वेग आणखी नियंत्रणात आणण्यासाठी अजूनही वेळ हवा आहे, अन्यथा कोरोनाचा गुणाकार कायम राहीला, तर बारामती तालुका पाच हजारांचा आकडा याच महिन्यातही गाठेल अशी भीती काही जणांनी व्यक्त केली आहे.


कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाल्यामुळे आणखी काही दिवस जनता कर्फ्यू लागू राहिल्यास ही साखळी तुटणार आहे. त्यामुळेच आता पुढील सातही दिवस बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यू लागू राहणार आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article