
मराठा आरक्षण: 6 जूनपर्यंत मागण्या पूर्ण करा अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी रायगडावरून आंदोलनाची सुरुवात- छ.संभाजीराजे
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. येत्या 6 जूनपर्यंत सरकारने ठोस भूमिका नाही घेतली तर आम्ही रायगडावरून भूमिका स्पष्ट करू, असं सांगतानाच मराठा समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू, असं भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आज स्पष्ट केलं.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबतची रोखठोक भूमिका व्यक्त केली. त्याचबरोबर नव्या राजकीय पक्षाचं सूतोवाचही केलं. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू. पण आता तो विषय नाही.
सध्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.
राजकीय स्टॅबिलिटी नव्हे सोशल इक्वेशन हवं
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही भेटणार आहात. त्यामुळे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, शिवशक्ती-भीमशक्ती ही पूर्वीपासूनच एकत्र आहे. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यामुळे या दोन्ही शक्ती एकत्रच होत्या आणि आहेत. प्रकाश आंबेडकर हे राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटणार आहे. मी राजकीय स्टॅबिलिटीसाठी त्यांना भेटणार नाही तर सोशल इक्वेशनसाठी भेटत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तर कोविडबिविड बघणार नाही, स्वत: आंदोलन करणार
मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आपलं ध्येय आहे. त्यासाठी मी सर्वांना भेटत आहे. आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांपुढे काही गोष्टी मांडल्या आहेत. सरकारने येत्या 7 जूनपर्यंत पाच गोष्टींची अंमलबजावणी नाही केली तर कोविडबिविड काहीच बघणार नाही. रायगडावरून आम्ही आंदोलनाला सुरुवात करू. मी स्वत: आंदोलनात उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.
मान सन्मान गेला खड्डायात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भेटलो. माझी विनंती आहे सगळ्यांनी एकत्र या. माझा मानसन्मान गेला खड्ड्यात, तुम्ही एकत्र या, 30 टक्के मराठ्यांसाठी नाही, पण 70 टक्के गरीब मराठा समाजासाठी एकत्र या, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीयांना पत्र पाठवून बैठक बोलवावी, आम्हीही या बैठकीला हजर राहू, असं ते म्हणाले.
गोलमेज परिषद
मराठा समाजाला आरक्षणासाठी दोन दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं. एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी हे अधिवेशन नको. तर आरक्षण कसं देता येईल हे सांगण्यासाठी अधिवेशन घ्या. आम्हीही गॅलरीत बसून अधिवेशनातील चर्चा ऐकू, असं ते म्हणाले. येत्या 9 ऑगस्ट रोजी दिल्लीत पहिली गोलमेज परिषद बोलावण्यात येणार आहे. मराठा आरक्षणावर ही गोलमेज परिषद असेल. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांच्या विरोधात नाही. सर्वांचं या गोलमेज परिषदेत स्वागत असेल, असं त्यांनी सांगितलं.