
सोमेश्वरच्या उच्चांकी गाळपाची यशस्वी सांगता, हंगाम बंद
Friday, May 14, 2021
Edit
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी(दि.६) रोजी रात्री बंद झाला. सोमेश्वरने उच्चांकी ११ लाख ३९ हजार मे.टन ऊसाचे गाळप करत १३ लाख २३ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. ११.६१ चा साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.अतिरिक्त ऊसाचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याने सर्व गाळप पूर्ण करत हंगामाची यशस्वी सांगता केली आहे. हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी बैलगाडीची तसेच ट्रक- ट्रक्टर चालकांनी आपल्या वाहनांवर गुलालाची उधळण केली.
चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्यापुढे जवळपास लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. मात्र शेतकी विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे तसेच सर्व सभासद, कामगार, अधिकारी, उसवाहतुकदार, संचालकमंडळ यांच्या सहकाऱ्याने हा हंगाम यशस्वी पार पडला. कारखान्याचा हंगाम तब्बल १९२ दिवस म्हणजे जवळपास सव्वा सहा महिने चालला. शुक्रवारी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक किशोर भोसले, सिध्दार्थ गीते, विशाल गायकवाड, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, डि.व्ही. माळशिकारे यांच्या उपस्थितीत गव्हाणीत नारळ टाकून हंगामाची सांगता करण्यात आली. हंगाम संपल्याने ऊसतोडणी कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.
सोमेश्वरने डिस्टलरी प्रकल्पातून चालू गाळप हंगामात १० कोटी ४१ लाख ५८ हजार युनिटची वीजनिर्मिती केली असून त्यापैकी ६ कोटी ९८ लाख ८२ हजार युनिट वीज एक्सपोर्ट केली आहे. ३१ हजार ७५९ मे.टन मोलासेस उत्पन्न घेतले आहे. अल्कोहोलचे ९४ लाख ३५ हजार लिटर तर इथेनॉलचे ४९ लाख ५७ हजार लिटर उत्पन्न घेतले आहे.