-->
महाराष्ट्रातील आमदारांना मोठा धक्का...तर पुन्हा होऊ शकते विधानसभा निवडणूक

महाराष्ट्रातील आमदारांना मोठा धक्का...तर पुन्हा होऊ शकते विधानसभा निवडणूक

मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अद्यापही तोडगा निघाला नाही. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असली तरीही सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शपथविधीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत सुनावणी पूर्ण झाली असून मंगळवारी कोर्ट आदेश देणार आहे. भाजप जर विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर भाजप राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करू शकते. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल आपल्या विवेकबुद्धीवर आणि नैतिकतेचा आधार घेऊन निर्णय घेत असतात. त्यामुळे महाविकासआघाडीला संधी द्यायची की विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय द्यायचा हे संपूर्णपणे राज्यपाल कोश्यारींच्या निर्णयावर अवलंबून आहे. तो अधिकार राज्यपालांना असतो.


      भाजप विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी विधानसभा बरखास्त केली तर पुन्हा एकदा राज्यात विधानसभेसाठी निवडणूक लागू शकते. असं झालं तर राज्यातील आमदारांना तो सर्वात मोठा धक्का असेल. कारण पुन्हा एकदा आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. राज्यात परत निवडणुका झाल्या तर बहुमताचा आकाडा गाठणं दूरच पण पुन्हा निवडून येणं मुश्कील होणार असल्याचं चित्र समोर दिसत असल्यानं आमदारांनाही चांगलाच घाम फुटला आहे.


            राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पुन्हा निवडणूक होणं सध्याच्या परिस्थित शक्य नाही. विरोधीपक्षांकडे आवश्यक असलेलं बहुमत आहे. फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर महाविकासआघाडीला संधी मिळू शकते. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी आदेश देणार आहे. त्यामुळे कोर्ट काय आदेश देणार? विश्वासदर्शक ठरावाबाबत कोर्ट काय निर्णय देतं हे पाहाणं महत्त्वाचं ठऱणार आहे.


              आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगत महाविकासआघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विनायक राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. 162 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र महाविकासआघाडीने राज्यपालांसह विधानसभा सचिवांना दिले आहे. मात्र, यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्राबाबत एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.


          महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलेले पत्र म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा नसून हे दिशाभूल करणारे पत्र आहे. पत्रावर गटनेत्याची स्वाक्षरी नसल्याचे असेही आशीष शेलार यांनी यांनी सांगितले आहे.त्यामुळे या पत्राला आम्ही गांभीर्याने घेणार नाही, आशीष शेलार यांनी म्हटले आहे.



           


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article