बारामतीत कोरोनाचे शतक, अजित पवार घेणार कठोर निर्णय
बारामती : देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातल्यानंतर लॉकडाऊनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवाडानंतर बारामती पॅटर्न राबवला. केंद्रीय पथकाने देखील या बारामती पॅटर्नचे कौतुक केले होते. याला काही प्रमाणात यश देखील आले. परंतु लॉकडाऊन शिथिल होताच बारामतीत कोरोनाचा धोका वाढला असून कोरोना संसर्ग आता पुन्हा वेगाने वाढत असल्याचं चित्र आहे.
बारामतीत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरच्या वर गेली असून आतापर्यंत नऊ जणांचा यात मृत्यू झाला आहे. बारामतीत काल 59 रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यामधील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
आता प्रशासन ही साखळी तोडण्यासाठी काय प्रयत्न करणार हा खरा प्रश्न आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातल्यानंतर लॉकडाऊन सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासनास सूचना देऊन बारामती पॅटर्न राबवला. या कालावधीत कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. सर्व अत्यावश्यक वस्तू मोबाईल अॅपद्वारे स्वयंसेवक मार्फत घरपोच मिळत होत्या. कोणालाही बाहेरगावी जाता किंवा येता नव्हते. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यात प्रशासनास यश आले होते. केंद्रीय पथकाने देखील या बारामती पॅटर्नचे कौतुक केले होते.
परंतु लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांचा पुणे, मुंबई व इतर शहरात प्रवास वाढला. इतर शहरातूनही नागरिक बारामतीत येऊ लागले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून कोरोना संसर्गाची साखळी आता थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. बारामतीत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरी पार गेल्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजित पवार काही कठोर निर्णय घेतात का, हे पाहावं लागेल.