पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव परीसरात काल दि ६ रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने परीसरातील शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे . याचे पंचनामे नोंद करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगांव ,तरडोली , सुपा , देऊळगाव रसाळ ,मुर्टी , आंबी , जोगवडी या परीसरात काल दि ६ रोजी सायंकाळी ७ ते रात्रभर मुसळधार पाऊस पडला.पाऊस सुरु असतानाच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या परीसरातील ऊस , कांदा , भूईमुग , बाजरी या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे .यामुळे शेतकऱ्यांचा हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला आहे .
मोरगांव परीसरात मोरगाव , तरडोली , मुर्टी , आंबी ,जोगवडी, लोणी भापकर , देऊळगाव रसाळ , सुपा आदी परीसरात गेल्यावर्षी लागण झालेला आडसाली , पुर्व हंगामी तसेच खोडवा , निडवा ऊस १६७४ हेक्टर जमीनीवर आहे .तर यंदा लागण झालेला आडसाली ऊस ७०४ हेक्टर जमीनीवर आहे .
काल पडलेल्या पाऊस , गारा , सोसाट्याचा वारा यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . मोरगांव परीसरात आडसाली व यंदा लागण झालेल्या ऊसाचे वारा व गारांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . ऊसाबरोबरोच बाजरी भूईमुगही जमीनदोस्त झाली आहे .
....................................................
मोरगांव परीसरात ऊसाचे झालेल्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दखल घेऊन पंचनामे नोंद करण्याचे आदेश द्यावेत. बाधीतांना नुकसान भरपाई द्यावी .
सतीश जगदाळे : प्रगतशील शेतकरी मुर्टी
.......................................................
सोमेश्वर सह साखर कारखाना सुरु झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांचे ऊसाची तोड तात्काळ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे .
लालासो नलावडे : संचालक सोमेश्वर सह . साखर कारखाना