
U19 World Cup Final: भारताच्या पोरांनी 'जग जिंकलं'; पाचव्यांदा अंडर-१९ च्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं!
Sunday, February 6, 2022
Edit
World Cup Fianl Match
भारताच्या युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय मिळवला. भारतानं पाचव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. राज बावा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच विकेट्स व ३५ धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. निशांत सिंधूने ( Nishant Sindhu) नाबाद ५० धावा करून भारताचा विजय पक्का केला. भारताने २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली प्रथम १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर २००८ (विराट कोहली), २०१२ ( उन्मुक्त चंद) आणि २०१८ ( पृथ्वी शॉ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.
भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा ( Raj Bawa) आणि रवी कुमार ( Ravi Kumar) या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या. राज बावाने ९.५ षटकांत ३१ धावांत ५, तर रवी कुमारने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रवी कुमारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर राज बावाने मधल्या फळीला नेस्तानाबुत करताना चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा सेट फलंदाज जेम्स रेवला माघारी पाठवले आणि राज बावाने अखेरची विकेट घेत इतिहास रचला.